आई असतो एक धागा,
वातीला उजेड दाखवणारी
समईतील जागा !
घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान,
विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडत रान !!
मातृदिन हा दरवर्षी आईचा सन्मान आणि आदर करण्यासाठी साजरा केला जाणारा हा एक वार्षिक कार्यक्रम आहे. हा आधुनिक काळातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. मातृत्वाला अभिवादन करण्यासाठी तसेच मातृबंधनांमध्ये वाढ करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. समाजातील मातांचा सन्मान वाढविण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. भारतामध्ये दरवर्षी हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो.
पुसते पाणी डोळ्यामधले
घास भरवते जी …… ती आई
आईचे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचे स्थान आहे. आईसाठी सगळेच दिवस सारखे असतात. परंतु आई आणि मुलाचे आयुष्य इतके गुंफलेल असतं की कितीही अडचणी आल्या तरी आई प्रत्येक पात्रात स्वतःला सामावून घेत असते. मग ते पात्र कोणतेही असो. शिक्षकाचे असो, मार्गदर्शकाचे असो किंवा एका चांगल्या मित्राचे असो. यामुळेच आईचा भावनिक आधार हा प्रत्येक मुलाला नेहमी प्रेरित करतो आणि एक चांगला माणूस बनण्यास मदत करतो.
आई म्हणजे सहवास
आई म्हणजे नाव आणि गाव
आई म्हणजे आयुष्याची शिदोरी
इतरवेळी दररोजच्या जीवनात आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहीत धरलेला असतो की, त्याची वेगळी दखल आपल्याला घ्यावीशी वाटत नाही. अर्थात हे सर्वांनाच लागू पडत नाही. आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, निस्वार्थी प्रेमाची आपण परतफेड आपल्या उभ्या आयुष्यात करू शकणार नाही, मात्र तरीही आईने आपल्याला दिलेल्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे हा मातृदिन होय.

सर्वप्रथम कोणी साजरा केला मदर्स डे?
ऍना जॉवीसया अमेरिकन महिलेने पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. ऍनाला आपल्या आई विषयी अत्यंत प्रेम आणि आदर होता. जेव्हा ऍनाच्या आईचे निधन झाले तेव्हा ऍनाने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या आईला समर्पित केले. आपल्या आईच्या निधनानंतर ऍनाने ‘मदर्स डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.
भारतातील मातृदिनाचा इतिहास
मातृदिनाची सुरुवात भारतात फार पूर्वीपासून झाली आहे, पण काही दशकापूर्वीपासून हा दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला जात आहे. आजच्या या संगणक आणि इंटरनेट सारख्या उच्च तंत्रज्ञानामुळे समाजात एक प्रचंड विकासाची क्रांती घडली आहे. जी सर्वसाधारणपणे सर्वत्र दिसून येते. आज कालच्या काळात लोक त्यांच्या नात्याबद्दल अत्याधिक जागरूक असतात आणि उत्सवाच्या माध्यमातून सन्मान मिळू इच्छितात. भारत हा एक महान संस्कृती आणि परंपरा असलेला देश आहे. जिथे लोक आपल्या आईला प्रथम स्थान आणि प्राथमिकता देतात.
आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करणारी म्हणजे आई. आई हे परमेश्वराचे दुसरे रूप असते आणि या आई बद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुठल्याही एका दिवसाची गरज नसते कारण आईवर प्रेम हे नेहमीच केले जाते पण तरीही हा दिवस सगळीकडे साजरा केला जातो. आपल्या या सुंदर आयुष्याचे अस्तित्व आईच्या गर्भातून चालू होतं. नऊ महिन्यापर्यंत आपल्या बाळाला ती तिचं रक्त देऊन आपल्या उदरामध्ये पोसते. त्याचा भार पोटातून वाहत असते. या काळात कितीतरी शारीरिक बदल तिच्यामध्ये घडत असतात. परंतु आपल्या बाळासाठी ती सर्व काही हसत हसत सहन करत असते. बाळ जन्माला येताना होणाऱ्या वेदनांचा तर तुम्ही आम्ही साधा विचारही करू शकत नाही. त्या वेदना ती हसत हसत सहन करत असते. बाळाला जन्म देताना त्या माऊलीचा ही त्या बाळासोबत पुनर्जन्म होत असतो.
आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचा संगम असणारी व्यक्ती म्हणजे आई. फक्त दोन अक्षरी शब्द आहे, पण त्यामध्ये सामावलेला अर्थ हा अथांग सागरापेक्षाही मोठा आहे. माणूस आयुष्यात पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो, पण आई व आईचे प्रेम त्याला पैशाने विकत कधीच मिळत नाही. त्यामुळेच…
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी
या शब्दात आईची व आईच्या प्रेमाची थोरवी गायली आहे.
अशा या थोर आईसाठी एक दिवस तिचा व तिच्या प्रेमासाठी साजरा करून त्या दिवसापुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही. कारण त्या एका दिवसासाठी सर्वांचे व्हाट्सअप डीपी, स्टेटस शुभेच्छा देणारे असतात व दुसऱ्या दिवशी मात्र ते बदलले असतात. फक्त डीपी आणि स्टेटस साठी हे मर्यादित न राहता दैनंदिन जीवनात दररोज याचा अवलंब प्रत्येकाने केला तरच खऱ्या अर्थाने मातृदिन साजरा केल्यासारखे होईल. आपण जन्माला यायच्या अगोदर पासून ते आपण जन्माला आल्यानंतर सतत आपलाच विचार करणाऱ्या, आपलीच काळजी करणाऱ्या, आपल्याला काय हवे काय नको याचा सतत विचार करणाऱ्या, आपल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या, खस्ता खाणाऱ्या, आपल्याला चांगले खाऊ घालणाऱ्या, आपली काळजी घेणाऱ्या, आजारपणात आपल्या उशाशी बसून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी देवाचा धावा करणाऱ्या, आपल्या अडीअडचणीत मार्ग दाखवणाऱ्या, आपल्या सगळ्या गरजा पुरवणाऱ्या, चार चौघांमध्ये वावरताना आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून झटणाऱ्या, आपल्या आनंदात आनंदून जाणाऱ्या आणि आपल्या दुःखात स्वतःला सामावून घेणाऱ्या, कितीही दमली भागली तरी आपल्या फर्माईशी आनंदाने पूर्ण करणाऱ्या आईला आठवण्यासाठी, तिचे आभार मानण्यासाठी मातृदिन हा एकच दिवस पुरेसा नाही.
आजही भारतीय संस्कृतीमध्ये आईची जन्माची शिदोरी जी मिळतही नाही आणि पुरतही नाही अशीच आहे. आपण तिच्या ऋणांमधून कधीच उतराई होऊ शकत नाही. म्हणून मातृदिना दिवशी आपल्याला या सुंदर जगात घेऊन येणाऱ्या त्या माऊलीला आपल्या कृतीमधून आदर व्यक्त करून तिचे आशीर्वाद घेऊन आपले जीवन कृतकृत्य करूया….
तमाम माता भगिनींना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
श्री. किरण विकास काळे
जि. प. प्राथ. शाळा, पिसोळी
ता. हवेली, जि. पुणे मो. ८८८८८००७४५